Monday, November 30, 2009

इस शहरमें ना अपना ठिकाना रहा...

तो. त्याने खांद्याला सॅक अडकवली. दाराला कुलुप लावलं. उरलेल्या दोन जड बॅगा हातात घेतल्या आणि खाली उतरला. खालच्या मजल्यावरच्या कुलकर्णी काकुंकडे किल्ल्या दिल्या. काकू अगदी मनापासुन हसल्या आणि त्याला म्हणाल्या "येत जा हो अधुनमधुन.. घर नाही असं समजु नको, सरळ आमच्याकडे यायचं. हक्काने ये हो." बिल्डींगमधुन बाहेर पडताना त्याला हसु आलं.. गेल्या २ वर्षात, तो इथे आल्यापासुन एकदाही काकू इतकं हसुन बोलल्या नव्हत्या त्याच्याशी. पद्धत म्हणुन किती गोष्टी अश्याच करतो आपण.. काकू म्हणाल्या "ये".. तो म्हणाला, "येईन".. त्याला हे मनात पक्कं ठाऊक होतं.. हे शहर परत नाहीच आणि ही बिल्डींग त्याहुन नाही.. आता इथे कशाला परत यायचं?

गल्लीच्या टोकावरच्या देवळाबाहेर तो थांबला.हा देव नवसाला पावतो म्हणतात पण ह्या देवाकडे त्याने कधीच काही मागितलं नव्हतं, ह्या देवाने दिलं नव्हतं. कित्ती काय झालं दोन वर्षात. ४ सेमिस्टर्स, असंख्य प्रोजेक्ट्स, एक प्रेमप्रकरण, २ जॉब इंटर्व्युज आणि काय काय... पण ह्या देवाचा संबंध नाही आला कशाशीच! तो जेव्हा जेव्हा ह्या देवळात आला त्याने कायम "वक्रतुंड महाकाय" म्हण्ट्लं, आज त्याला गंमत वाटली त्याच्याच वागण्याची.. त्याने प्रयत्न केला ह्या देवाचा श्लोक आठवायचा पण त्याला रामरक्षाच आठवत होती. नंतर शुज घालताना त्याला "उडाला उडाला कपि तो उडाला" आठवलं.. पण त्याला काही हा श्लोक विशेष आवडला नाही.

चालत चालत तो बस स्टॉपवर आला. आजवर एकदाही तो इथे आला नव्हता. त्याला ह्या शहरातल्या बसेस नाही आवडायच्या.. धुळकट्ट, मळलेल्या, गर्दीने भरलेल्या, कधीही वेळेवर न येणा-या, खिळखिळ्या... आणि त्यातुन त्याला कधीच नीट बसायला मिळायचं नाही आणि धड उभंही राहता यायचं नाही... तरी आज तो इथे येउन उभा राहिला. स्टेशनला जाणा-या ३ बसेस त्याने सोडल्या कारण त्यात गर्दी होती भरपुर, त्याने आज ठरवलं होतं गर्दी नसलेल्या बसमधुन मी बसुन जाणार. चौथ्या बसमधे चढला आणि त्याला जागा मिळाली. त्याच्या शेजारच्या बाकावरच्या मुलीने मोजुन सहावेळा त्याच्याकडे वळुन पाहिलं. " what is it? my post breakup glow or is it my black shirt?" त्याने विचार करत बाहेर पाहिलं.

post breakup glow..त्याला हसु आलं. ह्याच सिग्नलवरुन डावीकडे गेल्यावर कॉफी शॉप लागतं.. तिथेच यादवच्या बाईकवर बसुन ते अश्या काही आर्बिट गोष्टींवर बोलत बसायचे. दोन वर्षात तिथे येणारे बरेच चेहरे त्याच्या ओळखीचे झाले होते.. तिथे कोणी कॉफी प्यायला येत नसत..तिथे आल्यावर गप्पा मारताना काहीतरी म्हणुन लोक कॉफी घ्यायचे... मग तरी इकडेच का यायचे? यादव म्हणायचा तसं.." इथे फक्त नावाला महत्व आहे.. i think this is the most brand-conscious city... तुमच्या पॅटिस, श्रीखंडापासुन बायकांचे परकर, मुलांची शाळेची दप्तरं.. सगळ्याला ह्या शहरात brands आहेत". त्याला यादव आवडायचा, यादवच्या ह्या विचारमौक्तिकांच्या बदल्यात तो त्याला कॉलेजचे प्रोजेक्टस करुन द्यायचा... यादव त्याच्या रुमवर पडिक असायचा पण स्वतःच्या घरी त्याला दोनदाच बोलवलं यादवनं, शहराचं नाव राखलं त्यानं!

प्रेमप्रकरणात यादवने मदत केली होती त्याला.. "साले, इश्क-विश्क तेरे बस की बात नही... अभी छोड दे.. बादमे रोयेगा भाई.."... आज त्याला तिची आठवण यायला हवी होती, पण नव्हती येत. तो मुद्दामहून तिच्याबद्दल विचार करायचा प्रयत्न करत होता.. पण त्याला नेहेमीसारखं ग्लुमी वाटत नव्हतं आणि त्याला तसं आज मनापासुन वाटुन घ्यायचं होतं. स्टेशनवर उतरला. ह्या शहराबद्दलचा तिटकारा इथपासुनच सुरु झाला होता २ वर्षापुर्वी... लाईनीने उभे असणारे बिर्याणीवाले त्याला नाही आवडायचे.. स्टेशनमधे आल्यावर त्याने नेहेमीच्या टपरीवरचा चहा घेतला आणि बसला.

दर शुक्रवारी दुपारी तो इथे यायचा घरी जाण्यासाठी.. सोमवारी पहाटे घरुन निघायचा. सोमवारी घरुन निघताना त्याला जे वाटायचं ते आज इथुन घरी जाताना वाटतं आहे म्हणुन त्याला थोडं विचीत्र वाटलं. स्टेशनवर जोरात रेडिओ लागला होता. नीट मराठी येत असुन मुद्दाम अशुद्ध मराठी बोलणारी आरजे त्याच्या कायम डोक्यात जायची, ते एकमेव रेडिओ स्टेशन होतं तो इथे आला तेव्हा. "मी जात्ये गोव्याला माज्या holidays साठी.. पण my dear listeners, i will miss you.. n i will miss this awesome city, पण २ weeks मधे return येईन..." ती बोलत होती, तो ऐकत होता.. त्याने विचार केला, "miss this city? आपण काय मिस करणार? मला हे शहर नाही आवडत, कधीच नाही आवडलं , मी काय मिस करणार” तो हसला आणि ट्रेनमधे चढला..

शहर असं नाही.. पण माझी रुम नक्कीच मिस करेन.. किचनमधुन दिसणारी नदी.. यादव नाला म्हणतो त्याला! इथली थंडी, indeed most romantic winters ह्या शहरात होते...कॉलेज, प्रोजेक्ट्स, यादव नक्कीच मिस करेन.. कॉफी, कुलकर्णी काका-काकु त्याच्या बाल्कनीत उभं राहुन गप्पा मारायचे आणि आपण ते शांत उभं राहुन ऐकायचो.. ते पण मिस करेन... देउळ, आणि त्यातल्या नवसाच्या घंटा, आपण मागितलं नाही कधी पण मागितलं तर दिलं असतं त्याने, इतकी ओळख होती आता त्याच्याकडे..इथले दाबेलीवाले, इथले रिक्षावाले, इथल्या बेशिस्त ट्रॅफिकमधली शिस्त, मराठीपण आणि मराठीपण "pretend" करणारी रेडिओस्टेशन्स.. तो अजुन नवीन गोष्टींचा विचार करत होता.. त्याला हे शहर आवडायचं नाही.. अजिबात नाही.. आणि ह्या शहराचं न आवडणंच तो सर्वात जास्त मिस करणार होता. घाटात ट्रेन आली. बोगद्यातुन ट्रेन बाहेर आली... नेटवर्क परत आल्यावर त्याचा मोबाईल वायब्रेट झाला. त्याने मोबाईल काढला, पटपट कॉल लावला.. " य़ादव.. you were right.. damn you.. I hate your city.. I really hate it.. But you know what? I will miss that bloody city of urs.. no not u saale.. ur city.."


Sunday, October 11, 2009

तन्याच्या डायरीतली काही पानं

तन्मय बापट
चौथी अ
रोजनिषी
.........................................
७ सप्टेंबर २००८

आज मला कंटाळा आला. मी बाबाला म्हणाला मी शाळेत जाणार नाही. बाबा म्हणाला नको जाऊस, खाली गाड्या पुसायला लागतील कॉलनीतल्या लोकांच्या. बाबा वाईट् आहे. असंच म्हणतो कायम. बाबा मला आवडत नाही. मला म्हणाला की मी आता मोठा झालाय, आता मी शुरवीरासारखा एकटा झोपायला पाहिजे. मला तो एकटा पाडतो. तू झोप की शुरवीरासारखं दुस-या खोलीत. मी आणि आई झोपु एका खोलीत. आई पण बाबाच्या बाजुने बोलते. मी आजीला सांगणारे. मला आजीच आवडते. मी आज दाबेली खाल्ली. गणिताचा गृहपाठ राहिला आहे.
आता झोपेन एकटा. बाबाच्या आईला उद्या फोन करेन आता.
.............................................

२ ऑक्टोबर २००८
आजी आली आहे. मला सायकल घेउन देणार आहे ती ह्यावेळेला. बाबा नको म्हणाला पण आजी देणारे. बाबा म्हणाला, तनु लहान आहे.. मला कळतच नाही काही बाबाचं. मी पक्यासारखी सायकल घेणार आहे, गिअरवाली.. झूम..झूम शाळेत जाता येईल. रिक्षानी जायला जाम बोर होतं. त्या स्टुपिड मुली काहीही बडबडत असतात. त्या सायलीला बहिण झालीये म्हणे नवीन. पकाऊ..त्याबद्दलच सांगत असते. आणि सगळ्या मुली क्युट, स्वीट, कित्ती गोड म्हणत असतात. मी आणि आलोक त्यांच्या बॅगांचे पट्टे तोवर बांधुन ठेवतो. तेवढीच मज्जा येते. मी झोपतो आता आजीजवळ.
................................................

३० ऑक्टोबर २००८
आज काहीतरी घरात सॉलिड झालं आहे. मला कळलं नाही नीट. मी खेळुन आलो तर कोणी मला हात-पाय पण धुवायला सांगितले नाहीत. मी बाबाच्या लॅपटॉपवर जवळ बसलो तरी त्याने लक्ष दिलं नाही. जाम काहीतरी झालं होतं. आई आतल्या खोलीत होती. बाबा आणि आजी बाहेर.. आई बाहेर आली तेव्हा वेगळीच दिसत होती. रडल्यासारखी. मी सायलीला परवा ढकललं तेव्हा सायली अशीच दिसत होती. आजी लगेच मला घेउन आत आली. तनु आता ७ वर्षाचा आहे, कळतं का तुला? असं काहीतरी आई बोलत होती. बाबा काय बोलत होता ऐकु येत नव्हतं. काय झालं असेल? आजी पण काही सांगत नाही नीट.
.....................................................

९ नोव्हेंबर २००८
आज मी आणि आईने मज्जा केली खुप. आई शाळेत घ्यायला आली होती. मग आम्ही संभाजीपार्कात जाउन भेळ खाल्ली. तिच्यातल्या २ पाणीपु-यापण मी खाल्ल्या. नवीन टीशर्ट घेतले २. आईस्क्रिम खाल्लं. आणि हे सगळं झाल्यावर ती विचारत होती की बर्गर खायचा आहे का मेकडोनल्डमधला. मी नाही म्हणणार होतो पण मग आम्ही गेलो. आई वेगळीच वागते आता काही दिवस. मला काहीही विचारत होती. मला म्हणाली तुला एकट्याला झोपायला भीती वाटते ना? तर तुझ्याबरोबर झोपायला कोणी आलं तर? काहीही बोलत होती. पण मज्जा आली आज. आजीने अजुन सायकल आणली नाही आहे. बहुतेक आम्ही रविवारी जाउ.
......................................................

१३ नोव्हेंबर २००८
मी कोणाशीही बोलत नाही आहे. राग आलाय मला सगळ्यांचाच. सगळे खुप वाईट आहेत. मी नाही वागत का शहाण्यासारखा? मी त्रास देतो का कधी त्यांना? मी शाळेत जातो. मी ते सांगतात ते सगळं ऐकतो. सायकलचा हट्ट पण मी केला नाही सारखा सारखा. आजी आपणहुन म्हणाली मी देते म्हणुन. आणि आता हे म्हणतात की ते अजुन एक लहान तनु घेउन येणार म्हणे. मी त्याला येऊच देणार नाही. आला तरी मी त्याला माझ्या खोलीत घेणार नाही. माझं घर आहे. माझे आई-बाबा आहेत. हा कोण नवीन येणार आता माझ्या घरात? साऊ परवाच सांगत होती तिची आई साऊ ला जवळ घेत नाही जास्त त्या बाळालाच जवळ घेते सारखी. एक बाळ असताना दुसरं बाळ का आणतात?
.........................................................

२९ नोव्हेंबर २००८
मी आज एकटा रिक्षापर्यन्त गेलो. मी आज माझ्या बुटांची लेस स्वतः बांधली. आता कोणाला माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ होणारच नाही ना. मी सवय करुन घेणार होतो पण सायली म्हणाली की इतक्यात नाही येणारे तुमच्याकडे बाळ. मे महिन्यात येईल असं तिची आई म्हणत होती. तिच्या आईला काय माहित? आमचं बाळ आहे. आम्हाला हवं तेव्हा हॉस्पिटलात जाउ आणि आणु आम्ही बाळ. आजी म्हणाली उद्या जाऊ सायकल आणायला. मी गंमत करणारे. माझ्याकडेपण खुप पैसे आहेत. मी आजीला पुस्तक घेउन देणारे तिनी सायकल घेऊन दिल्यानंतर. उद्या आजी झोपली की मी पिगी बॅन्क उघडेन. आजीच माझी लाडकी आहे.
..........................................................

४ डिसेंबर २००८
बाबा हल्ली उशिरा घरी येतो आणि आई खूप लवकर घरी येते. ती आता जास्त क्लास घेत नाही. आई माझी चित्रकार आहे. ती म्हणाली आहे की ती माझी खोली सजवुन देणारे. मला माहित्ये ती खोली माझ्यासाठी नाही, नवीन बाळासाठी सजवणारे. आजीनी परवा सायकलच्या दुकानातुन परत येताना मला सांगितलं की आता आईला त्रास द्यायचा नाही. तिच्याकडे हट्ट करायचा नाही. तीला कामात मदत करायची. पण मी कधीच आईला त्रास दिला नाही. आलोक म्हणतो लहान भाउ आल्यावर मोठा भाऊ आई-बाबांना वाईट दिसायला लागतो. साऊने पण तसच सांगितलं होतं. पण माझी आई चांगली आहे. ती असं वागणार नाही. बाबाचं माहित नाही. मी आज एकट्याने सोसायटीच्या गेट्पर्यंत सायकल चालवली.
...........................................................

२४ डिसेंबर २००८
आज आईचे पाय खूप दुखत होते. मी विचारलं चेपुन देऊ का? तर जवळ घेत म्हणाली. नको रे तन्या, तू खेळायला जा. मी गंमत केली. कोणाला न सांगता माझ्याकडचे पैसे घेउन सायकल ने सोसायटी बाहेर गेलो. एकट्याने रस्ता क्रॉस केला आणि पाय दुखायचा औषध घेउन आईला आणुन दिलं. आई तर रडायलाच लागली. मला कळलं नाही काहीच. मग म्हणाली तनू मोठा झाला माझा. मी मोठा झालोच आहे. आणि आजीचा ऐकायचं असं ठरवलं आहे. आईला त्रास नाही देणारे मी. आईने बाबाला सांगितलं तेव्हा बाबाने पण कौतुक केलं. बाबा म्हणालाय ह्या रविवारी पिक्चर बघायला जाऊ. बाबा पण तसा चांगला आहे.
...............................................................

१६ जानेवारी २००९
बाळ कसं होतं? मला कोणी सांगितलंच नाही आज मी सगळ्यांना विचारलं. मला आणि आलोकला वाटायचं हॉस्पिटलमधे मिळतं बाळ. पण सायली म्हणाली आईच्या पोटातुन येतं बाळ. पोटातुन कसं काय येईल? सायली येडी आहे. माझ्या आईचं पोट कापतील ते? आईला काही होणार नाही ना माझ्या? आईला हल्ली कुठे कुठे दुखतपण असतं. मला वाईट वाटायला लागलं आहे. मला आई आवाडते माझी. प्लीज देवा, माझ्या आईला काही करु नकोस. मी त्या नवीन बाळाशी चांगला वागेन. रविवारी सोसायटीतल्या सुरेखा कुत्रीला ५ पिल्लं झाली. बाबा म्हणाला आपल्याकडे एकच बाळ येणारे. मी घाबरलोच होतो. ५ भाऊ-बहिणी झाले असते तर आम्ही "मोठे कुटुंब- दु:खी कुटुंब" झालो असतो.
.............................................................

२८ जानेवारी २००९
बाबाने सांगितलं की लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी देव बाळ देतो आई-बाबांना. जर त्यांनी चांगला वाढवलं पहिल्या बाळाला तर अजुन एक बाळ देतो. म्हणजे देवाला वाटलं माझे आई-बाबा मला चांगलं वागावतात तर! बाळ पोटातुन बाहेर येतं. पण बाबा म्हणाला आईला काही होणार नाही. मग ठीक आहे. पण बाळ पोटात जातं कसं हे विचारलं तर म्हणाला आजीला विचार. बाबा इतका मोठा झालाय तरी त्याला खुपश्या गोष्टी माहित नाहीत.
आजी शहाणी आहे. आजीने बरोबर सांगितलं. माझ्या डोक्यात बुद्धी आहे. कुठुन गेली कळलं का? नाही ना. तसचं बाळ येतं. आजीने बाबांना काही शिकवलं नाही बहुतेक. बाबाला तर हनुमान स्तोत्रपण पुर्ण येत नाही. पण तो कठीण कठीण श्लोक म्हणु शकतो.
..................................................................

६ फेब्रुवारी २००९
सायलीची आईपण येडीच आहे सायलीसारखी. तिने सायलीला सांगितलं की प्रसाद खाल्ल्यामुळे बाळ होतं. हनुमानच्या आईने नाही का आकाशातुन पडलेला प्रसाद खाल्ला आणि मग हनुमान झाला. मलाही आता वाटतं आहे तसं. आलोक तर घाणेरडा आहे. तो घाण काहीही सांगतो पिक्चरमधल्यासारखं. मी आणि सायली बोलत नाहीयोत त्याच्याशी. काल आई विचारत होती, भाऊ झाला तर नाव काय ठेवायचं? मी आईला सांगितलं, भाऊ झाला तर म्हणजे काय? मला भाऊच हवा. मुली नाही आवडत मला. बावळट असतात. मी विचार करतोय आता भावाच्या नावासाठी. सचिन किंवा राहुल किंवा रिहितीक किंवा शाहिद असं काहीतरी पाहिजे. महेन्द्र नाही आवडत नाव मला आणि धोनी तर आडनाव आहे.
.......................................................................

२९ मार्च २००९
मी आणि बाबा आणि आजी आम्ही तिघंच आहोत आता. आई मुंबईला गेल्ये तिच्या आईकडे. मी पण जाणार होतो पण माझी वार्षिक परीक्षा आहे. आईला सांगितलं आहे मी, मी आल्यानंतरच बाळ आण. आई म्हणाली मे महिन्यात आणेल. साऊची आई हुशार आहे म्हणजे, ती म्हणाली होती. बाबा आणि मी खुप धमाल करतो. आम्ही दोघं परवा सकाळी सायकल चालवत ग्राउंडवर गेलो होतो. बाबा खुप मस्त आहे. तो विडीओ गेम पण घेउन देणारे. बाबा असा वेगळा वागतो ना कधी कधी कळतच नाही. आजीपण माझ्या आवडीच्याच भाज्या करते. आईसारखं वांगं नाही खायला लावत. पण खरं सांगु? मला आईची आठवण येते. मला आईच्या कुशीत झोपायचं आहे. तिचे पाय दुखत असतील तर तिथे तिला कोण औषध देत असेल? परीक्षा झाली की त्या च्या त्या दिवशी मी मुंबईला जाणार.
.................................................................

५ एप्रिल २००९
माझी परीक्षा संपली. मला आजच मुंबईला जायचं होतं पण बाबा वाईट आहे. तो म्हणाला रविवारी सोडेल तो मला मुंबईला. मी आईला रोज फोन करतो. आईपण मला करते फोन. आलोक मला म्हणाला. बघ बाळ यायच्या आधीच आई लांब गेली तुझ्यापासुन. असं खरचं असेल का? आई माझ्यावर प्रेम करेल ना? मला रडुच येतं रात्री झोपताना. सायलीची बहिण साऊचे केस ओढते आता आणि सायलीने तिला मारलं तर तिची आई सायलीलाच ओरडते. माझा भाऊ मारकुटा असेल तर? मला कोणी धड कसलं उत्तरच देत नाही. कोणालाच काही माहित नाही.
......................................................................

१० मे २००९
मी मुंबईत आहे. पुण्याच्या हॉस्पिटलमधे बाळ मिळत असताना आई मुंबईला का आली? मी आईबरोबर आज हॉस्पिटलमधे गेलो होतो. तिथे २-३ बाळं पाहिली ठेवलेली. किती लहान होती. छोटी एकदम. सुरेखाच्या पिल्लांसारखी क्युट. मी क्युट म्हणालो तर आई हसली. पण बाळं खरचं क्युट असतात. तिथल्या डॉक्टरकाकु मला म्हणाल्या. काय मग दादा होणार ना तू आता? मज्जा करणार ना? . मला असली धमाल वाटली. इतके दिवस लक्षातच नव्हतं आलं. मी दादा होणारे.’तन्मय दादा’ म्हणेल मला माझा भाऊ. कसलं भारी. मला खूप आनंद झाला आहे. मी आईला सांगितलं मी चिन्मय नाव ठेवणारे भावाचं आणि त्याला चिनु म्हणायचं. चिनुला मी सायकलवर शाळेत नेईन.
.....................................................................

१ जुन २००९
ढीपाडी डिपांग.. ढीपाडी ठिपांग... मी दादा झालो. मी तन्मय दादा झालो. आम्हाला बाळ झालं आहे. मुलगा बाळ. गोरं आहे एकदम सायलीसारखं. मी काल त्याच्याशी बोलत होतो तर हसला तो. आणि त्यानी बोटचं धरलं माझं.
त्याला मी आवडतो. मला तो आवडतो आणि आई-बाबांना आम्ही दोघं आवडतो. जरा मोठा झाला तो की मी त्यालाच विचारणारे तू कसा झालास नक्की? मला माझा जन्म आठवत नाही. चिन्या विसरायच्या आधीच त्याला विचारणारे.

Friday, September 25, 2009

साबणाचे फुगे

गेले २-३ दिवस खूप कंटाळ्यात घालवले, कंटाळा म्हणण्यापेक्षा अस्वस्थतेत घालवले. अंगावर आलं होतं सगळं, लोकं बेजबाबदार, unreasonable वागत होती. सगळ्यातुन बाहेर यायचं होतं ... पण तरीही बाहेर पडायचा मुड नव्हता. त्यातुन आमच्या एरिआत नवरात्रीमधे जत्रा असते. ९ दिवस माणसंच माणसं, गर्दी, फेरीवाले, गाड्या आणि सगळ्याचा आवाज.. भयानक कंटाळा आला होता!

पण तरीही बाहेर पडले...गर्दीतुन वाट काढत, माणसांमधुन चालत मी पुढे जात होते. I hate it when people walk real slow and that too in groups! चमचमत्या साड्या नेसुन, नटुन-थटुन आलेल्या मुलींचे घोळके डोक्यात जातात राव.. अगं बायांन्नो मज्जा करा, खरेदी करा, धमाल करा, खा-प्या.. वाट्टेल ते करा.. पण अशी वाट अडवु नका गं.. जरा, म्हणजे अगदी जर भराभर चाला की.. बरं slow चालायचं आहे? चाला.. हळू चाला. पण मग निदान रस्त्याच्या कडेने तरी चाला ना पोरीन्नो.. राग राग होतो अगदी!

असे मंद घोळके पाहिले की आमचं पुणं आठवतं ( कसलं सहजपणे आमचं पुणं लिहीलं मी.. आवडलं मला) . तुळशीबागेत, मंडईत, लक्ष्मी रोडवर असे मंद घोळके फिरत असतात पण तिथे कोणालाच विशेष घाई नसते त्यामुळे कितीही हळू चाललं तरी त्रास होत नाही. तिथल्या हवेत आहे तो मंदपण, पण छान असतो तो.. पुण्याबाहेरच्या लोकांनांच त्रास असतो.. उगाच नावं ठेवत असतात. आई गं, पण मी तरी कुठे पुण्याची आहे? हे असं confusion कायम होतं माझं मी कुठली आहे हे ठरवताना.

तोच विचार करत मी पुढे चालले होते. तेव्हा एका कपड्यांच्या दुकानासमोर एक आई आणि सुप्पर्रगोड छोटीशी मुलगी, त्या मुलीसाठी छानसा, cuteसा, छोटासा स्कर्ट घेत होत्या. ते इतकं cute होतं की नकळतपणे मी जरा मोठयानेच म्हणाले "कसलं गोड" . ती आई मा्झ्याकडे बघुन हसली. व्यवस्थित घारी-गोरी असुन हसली ह्याचं मला आश्चर्यच वाटत होतं. मी पण हसले मग...

तिथुन पुढे वळल्यानंतर पाणीपुरी-भेळपुरीच्या गाड्या दिसायला लागल्या आणि एकदम भुक लागल्याचं जाणवलं. भुक म्हणजे अगदी भुक नाही पण शरीराला पाणीपुरी-शेवपुरी-भेळ वगैरे अश्या उघड्यावरच्या अन्नाची deficiency जाणवायला लागली. १-२ प्लेट पाणीपुरी कोणीही खातं राव.. म्हणजे खायलाच पाहिजे. पण एका पाणीपुरीवाल्याकडुन २ प्लेट खाउन "तिखा बनाया भैय्या" सारखं हिंदी फाडत त्याच्यासमोर दुस-या पाणीपुरीवाल्याकडुन मिडीयम पाणीपुरी खायला मज्जा येते. पाणीपुरी खाल्यानंतर डोळ्यांतुन पाणी आलं तरचं ती पापु best असते. तृप्ती आणि आनंदाश्रु at their best असतात तेव्हा!

थोडं पुढे गेल्यावर गर्दी वाढली. खुप फेरीवाले होते. काय काय भारी भारी विकत होते. खेळणी, गाड्या, फुगे, पिपाण्या, धनुष्य-बाण, टोप्या, खोटे दागिने, घड्याळं, पिना-बिना, दिवा लागणारं पेन, रेडियम ची खेळणी, पिसांची पेन्सिल, शाकालाकाबुमबुमच्या पेन्सिली आणि खूप काही. भविष्य सांगणारे रोबो होते, आकाशपाळणे, टोरो-टोरो, ट्रेन, आकाशात उंच उडणारे आणि दिवा लागणारे चेंडु फेरीवाले उडवुन दाखवत होते, मेंदीचे ठसेवाल्या बायका, फुलंवाले, खाजा, सुतारफेणी, बदाम हलवा आणि तत्सम मिठाईवाले, सगळीकडे गलका.. सगळे आपापली वस्तु जोरजोरात ओरडुन विकायचा प्रयत्न करत होते. मी हरखुन गेले होते, माझ्यातली लहान तेजु उड्या मारुन मला सांगत होती "बाबा नाहीयेत ना आत्ता इथे.. घे की तुला हवं आहे ते बिन्धास्त.." काय काय होतं तिथे. इथे तिथे बघत असताना अचानक माझं लक्ष गेलं साबणाच्या फुग्यांकडे.. लहानपणापासुन आत्तापर्यंतचा माझा सर्वात आवडता खेळ.. साबणाचे फुगे. त्या बाईच्या दिशेने जायला लागले आणि दिपीकाने आडवलं "ताई उगाच काय काहीतरी? वेडी आहेस का? लहान आहेस का आता?" मी इतरवेळी तिला दचकुन असले तरी मी ह्यावेळेला तिचं ऐकलं नाही मी त्या बाईकडुन ८ रुपयांची साबणाच्या द्रावणाची डबी घेतली. बाबा पुर्वी घेउन द्यायचे तेव्हा जसा आनंद व्हायचा तसाच आनंद झाला.. भारी वाटलं, एकदम भारी!

लहान मुलांसारखं ते विकत घेतल्यावर रस्त्यावर फुगे उडवणं बरं नसतं दिसलं म्हणुन पटापट घरी चालत आले. घरी आल्या आल्या चपला उडवुन पिशवीतुन डबी काढली आणि साबणाचे फुगे बनवायला सुरुवात केली.. कसली मज्जा आली राव.. काय ना त्या फुग्यांचं आयुष्य.. काही क्षणाचं.. माझ्या बदलत्या मुड्सप्रमाणे.. कंटाळा, राग, confusion, आश्चर्य, आनंद... एक फुगा फुटुन लगेच दुसरा उडणार..
काही वेळासाठीच पण खुप आनंद देणारे आणि मग काही हवेत विरुन जाणारे तर काही फुटुन जाणारे.. डोक्यातल्या असंख्य विचारांसारखे..
त्यांच्यातल्या वेगवेगळ्या रंगांच्या छटा, लहान मोठे आकार, काही खुप दुर उडणारे काही जवळ्जवळ राहणारे.. माझ्या आजुबाजुच्या लोकांसारखे.. त्यांच्या आठवणींसारखे!
जोरात फुंकर घातलीत तर भर्रकन अनेक लहान फुगे उडतील. हळुवार नाजुकपणे फुंकर मारलीत तर मोट्ठा छान जास्त वेळ टिकणारा एखादा फुगा तयार होईल. Time, patience, commitment आणि relationship ची गणितं एका क्षणात समजावुन सांगणारे फुगे.

असाच एक मोठ्ठा फुगा मी हळुवार फुंकर घालुन तयार केला आणि मग तो उडायच्या आधीच त्याला माझ्या हातानी फोडला... माझा २-३ दिवसांचा कंटाळा हवेत विरुन गेला.

(ही पोस्ट अपुर्ण आहे, random आहे, पण तरीही publish करावीशी वाटली म्हणुन..)

Wednesday, September 16, 2009

आनंद

मी त्याला एकदाच भेटले. तेसुद्धा फक्त २ तास बोलणं झालं... म्हणजे २ तास तो बोलत होता मी ऐकलं. पण उसमें कुछ बात थी! भन्नाट माणुस होता. मला इतके दिवस गर्व होता की मी कितीही बडबडु शकते... खूप खूप बोलु शकते अगदी non-stop वगैरे.. पण साडेसाती संपता संपता शनिने आनंदला भेटवुन माझं गर्वहरण केलं. Boss.. 2 तास एका अनोळखी माणसाशी बोलणं, ते सुद्धा अगदी प्रामाणिकपणे.. परीक्षेच्या दिवशी..महान होतं ते! काही माणसं बघुनच कशी आहेत ते कळतात..म्हणजे त्यांच्या डोळ्यांना खोटं बोलताच येत नाही..तसे आनंदचे डोळे होते. कित्ती प्रामाणिक, साधे... किती भोळा माणुस आहे तो!

परीक्षेसाठी मी सेंटरवर गेले आणि नोटिस बोर्डावर माझा नंबर बघत होते. तो तिथे बाजुलाच उभा होता.. अगदी कोणाचंही त्याच्याकडे लक्षसुद्धा जाणार नाही असा दिसणारा.. मी नंबर बघुन माझ्या exam hall कडे निघाले.. तो पण मागुन आला... "कुठे आलाय तुमचा वर्ग?"
मी वळुन पाहिलं फक्त.. "बेसमेन्ट"...
त्याला लगेच आनंद झालेला दिसला.. "माझा पण तिथेच आलाय नंबर.. कुठे असतं ते माहित्ये का?"
म्हणजे मी शिष्ठ नाहीये आणि मुद्दामहुन पण तसं करत नाही पण माझी एक भुवई उंचावली गेली.. बब्बा.. तू इथे इतकी मोठी परीक्षा द्यायला आला आहेस.. बेसमेन्ट नाही माहित? .. " हे काय इथे खाली जाउन.. लिहीलं आहे तिथे बेसमेन्ट म्हणुन".. तो हसला आणि म्हणाला "हो का? असेल.. कोणत्या वर्गात आलाय तुमचा नंबर?"
"तीन नंबर खोली".. तो परत हसला... त्यांच्या हसण्यामधे काहीतरी वेगळं जाणवलं मला.. पण तेव्हा कोणाचं analysis करण्याचा mood नव्हता..
"अभ्यास झाला का तुमचा? माझा नाही झालाय नीट.. पत्रकारितेचा इतिहास वाचलात का? महत्वाचा भाग आहे.. त्यावर येतात प्रश्न.. काय वापरुन केलात तुम्ही अभ्यास?"
" मी college notes फक्त"
तो परत हसला...

मी माझ्या जागेवर येउन बसले.. त्याची जागा खरं तरं खूप पुढे होती पण तोसुद्धा आला माझ्या बाजुच्या बाकावर.
" अश्या ओळखी झाल्या ना की बरं असतं.. contacts निर्माण होतात. एकमेकां साह्य करु म्हणतात ना..तसं , म्हणजे आता उद्या विद्यापीठात काही काम असेल तर मला सांगु शकतेस.. मला काही मदत हवी असेल तर मी तुला विचारु शकतो.. मला ना ह्या क्षेत्रातलं काही माहित नाही..म्हणुन मी मैत्री केली तुझ्याशी..नवीन गोष्टी कळतात नवीन माणसं भेटली की"... मी बघत होते फक्त त्याच्याकडे.. गाडी तुम्ही वरुन तू वर आली.. मैत्री पण केली? मला खरं तरं हसुच येत होतं.. पण मी फक्त "हो बरोबरे" इतकंच म्हणाले.
"माझं नाव आनंद.. तुझं काय आहे?" असं म्हणुन त्याने हात पुढे केला.. मी (again m not at all शिष्ठ) हात नाही पुढे केला फक्त माझं नाव सांगितलं.. आता तो बिचारा हसला आणि पुढे केलेल्या हाताचं काय करायचं ह्या विचारात पडला.. मग मलाच वाईट वाटलं आणि मी handshake केला. मग तो परत मोठ्ठं हसला... हां, आता कळलं त्याच्या हसण्यात काय वेगळं आहे ते.. तो हसताना त्याचे खालचे-वरचे सगळे दात दिसतात.. (माझे फक्त वरचेच दिसतात.. तुम्ही पण हसुन बघा.. म्हणजे पाहिलं असेलचं एव्हाना :P )

5'5''-6'' वगैरे उंची, दाढीचे खुंट वाढलेले, मिशी, बारीक डोळे, व्यवस्थित कापलेले केस, पांढरा सदरा आणि मातकट पॅंण्ट... त्याच्यासारखी दिसणारी ६७ माणसं असतील एखाद्या ST standवर... पण त्या ६७ माणसांपासुन ह्याला काही वेगळं करत असेल तर त्याचं मनापासुनचं मोठ्ठं smile..
"वडील काय करतात तुझे?.. ओह चांगलं आहे.. भाउ-बहिण कोण? फक्त एक बहिण? आधुनिक दिसता म्हणजे तुम्ही..चांगलं आहे. मी सोलापुरचा आहे.. आमची शेती आहे तिथे. मी आधी मराठीत MA केलं आहे.. आणि आता पत्रकारिता" हा माणुस बोलतच राहिला.. मी फक्त उत्तरं देत होते तो विचारत होता त्याची.. आणि "हो बरोबरे" एवढंच.. म्हणजे त्या पलीकडे मला बोलायला काही chanceच नव्हता. घरुन निघतानाचं परीक्षेचं tension ह्याच्या बडबडीमुळे कुठच्या कुठे गेलं होतं. तो त्याच्या बाकावर जायला निघाला आणि एकदम थांबुन म्हणाला.. "तुझी पिशवी आहे ना? माझी वही ठेव त्यात"... दिपीकाला मी अजुन सांगितलं नाही आहे की तिच्या नवीन trendy college bag ला एक मु्लगा पिशवी म्हणाला... "best of luck.. पेपर झाला की बसुया एकत्र म्हणजे जरा चर्चा करता येईल नं" असं म्हणाला तो पुन्हा एकदा सगळे दात दाखवुन.. मी जरासं smile दिलं.. "best of luck"... त्याच्या बाकावर बसल्यावर परत एकदा त्याने मागे वळुन पाहिलं आणि हसला... मी किती sad आहे म्हणजे मी किती कमी हसते ते मला एकदम तेव्हा जाणवलं.

माझा पेपर तसा लवकर झाला.. मी बसले होते अशीच. आनंद लिहीत होता, मधेच त्याने इथे-तिथे पाहिलं ..मी तशीच बसल्ये हे पाहिल्यावर त्याचे बारीक डोळे जेवढे मोठे होऊ शकतात तेवढे मोठे करुन .. "झाला?" असं विचारलं. मी मान हलवली.. ती सुद्धा किती थो्डीशी...आणि त्याचा पेपर लिहीणं सुरु असुनसुद्धा तो किती मनमोकळं हसला... त्याच्या आई-बाबांनी अगदी बरोबर नाव ठेवलं आहे त्याचं.
एक पेपर झाल्यावर दुसरा पेपर सुरु व्हायला दिड तास वेळ होता. बाहेर पडतानाच त्याने विचारलं.. "शेवटच्या प्रश्नाचं काय लिहीलं उत्तर?" मला दडपणचं आलं.. बापरे आता हा चर्चा करणार की काय? पण मी उत्तर द्यायच्या आधीच तो बोलायला लागला " मी तिसरा पर्याय लिहीला.. तोच आहे बरोबर पण म्हणजे वर्तमानपत्र आणि त्याचे संपादक पाठ केले होते.. तसा चांगला होता नं पेपर? आता पुढचा कसा जातो बघायचं, वेळ आहे अजुन.. बसुया कुठेतरी.. काही खायचं आहे का तुला? मला नकोय काही.. एखादं फ्रुटी प्यायलं तरी बास होतं.. पण आत्ता बसुया जरा.. जरा बोलु आणि मग बघुयात. तू बस मी आणतो एक पुस्तक मित्राकडुन.. तो दुस-या वर्गात होता...." आणि मी म्हंटलं.. "हं..ये"

"आमचं गाव अक्कलकोट, पंढरपुर आणि तुळजापुर पासुन प्रत्येकी ४० किमीवर आहे. ये कधी गावाला आमच्या.. अक्कलकोट्ला घेउन जाईन तुला.. तिथे गेल्यावर काहीतरी वेगळंच वाटतं बघ.. म्हणजे सांगता येत नाही. आपल्याबरोबर कोणीतरी असल्यासारखं.. माझी स्वामींवर खुप श्रद्धा आहे. आपण कष्ट करतो पण शेवटी फळ मिळण्यासाठी बरोबर कोणीतरी असावं लागतं. स्वामी मदत करतात, मी गावाला गेलो की जाउन येतो दोस्तांसोबत स्वामींच्या दर्शनाला"... मला एकदम तो टिळा लावुन वगैरे दिसायला लागला "तू धार्मिक दिसतेस.. घरी आई-वडिल, आजी-आजोबा करत असतील ना देवाचं.. म्हणजे रामायण-महाभारत वाचत असतील ना?" इतका वेळ मी हसले नव्हते पण आत्ता हसले.. "नाही मी इतकी नाही.. बाबा वाचतात".. रामायण-महाभारत.. :)

मी आईला कॉल केला मधेच.. बोलुन झाल्यावर हा सुरु झाला "तुला सांगतो तेजश्री... (मला सॉलिड्ड राग आला होता. पण काही बोलले नाही) आमच्या गावात अजुन वीज नाही. कोम्प्यूटर सोड मला मोबाईलही अजुन वापरता येत नाही. म्हणजे आजच्या भाषेत MA करुनही मी अशिक्षीत आहे बघ. मी मराठीत MA केलं.. पण पुढे काय करणार? phd करुनही पुढे काय? म्हणजे उगाच इतकं शिका..आणि पुढे काय उपयोग? म्हणुन हा पत्रकारितेचा कोर्स केला.. विद्यापीठात राहतो मी.. आमची शेती आहे ६ एकर उसाची.. भाऊ नोकरी करतोय त्यामुळे शिकु शकतोय.. म्हणजे तसं चांगलं आहे. पण अपराधी वाटत राहातं.. रोजचा बस, जेवणाचा खर्च वगैरे धरुन २५-३० रुपये होतात. आई आठवड्यातुन एखादवेळा फोन करते.. विचारते कसं चालु आहे? नीट जेवतोय्स ना?.. खुप वाईट वाटतं. ते आपल्यासाठी इतकं राबतात आपण काहीतरी करायला हवं.. म्हणुन मला प्राध्यापक होयचं आहे. तेवढाच आईला अभिमान पोरगा प्राध्यापक झाला! गावात असं शिक्षणाचं वातावरण नसतं.. झालाच तर पोरगा शिक्षक होतो. पण इतक्या शिक्षकांना नोक-या द्यायला शाळापण हव्यात ना.. मला दहावीत असताना ७२% मिळाले. तेव्हाच ठरवलं प्राध्यापक व्हायचं, काहीतरी करायला हवं.. त्यांच्यासाठी." त्याच्या डोळ्यांत कळवळ दिसत होती. किती वेगळी जगं आहेत आमची...मी काही बोलणार तेवढ्यात तो परत सुरु झाला..
"अगं पण हे कळत नाही आजच्या मुलांना.. तुला सांगतो तेजु ( तेजश्रीपेक्शा तेजु बरं होतं) विद्यापीठातलं वातावरण इतकं वाईट आहे.. परवाची गोष्ट आहे..आम्ही कॅण्टीनमधे बसलो होतो. एक मुलगी रडत होती आमच्या बाजुच्या टेबलवर तिचा प्रियकर असावा सोबत. तो तिला काहीतरी सांगत होता, आणि ती रडत होती.. ह्या पोरींना उध्वस्त होण्यात काय मिळतं? त्या शिकायला आलेल्या असताना प्रेमात पडतात.. त्यांना कळत नाही जेवढं उडाल तेवढं जोरात आपटाल.. कळत कसं नाही ह्यांना? माझी बहीणीने असं काही केलं असतं तर मी तिला एक दिली असती लगावुन.. उध्वस्त होण्याची ओढ.. दुसरं काय?" माझा चेह-यावर मी सिरिअस भाव ठेवले होते.. पण मनात ह्सत होते.. मला आवडलं.. ’उध्वस्त होण्याची ओढ’
"माझ्या मागे लागली होती एक मुलगी.. विश्वास नाही बसणार तुझा" hehe.. आता हे interesting होतं.. " अगं, माझ्या मागे लागली.. मी संयमाने वागुन होतो. कारण मला माहित होतं एकदा ह्यात पडलो की उध्वस्त होऊनच बाहेर पडतो माणुस.. मी तिला जरा चांगल्या गोष्टी सांगायला लागलो.. तिला म्हणालो.. अभ्यास कर.. मी friendship देउ शकतो. पण १४ फेब्रुवारी ला प्रपोजचं मारलं कि तिनं मला... " बाबाबाबास्स्स... मला sollidd हसु यायला लागलं.. तो कसला blush होत होता हे सांगताना..किती निरागस..
" मी आधी नाहीच म्हणालो.. पण मग म्हणालो.. माझ्यामुळे सुधारेल मुलगी...पण कुठचं काय? अगं एक दिवस म्हणाली बागेत जाउया.. तिथली जोडपी बघुन मला कसंतरीच वाटलं.. शिकायला येता विद्यापीठात का आसं काही करायला? मी निघुन आलो तिथुन.. तिला म्हणालो जरा दिवस थांबुया.. प्रेम खरं असेल तर काही होणार नाही.. २-३ महिने गेले मधे.. मी सुट्टीसाठी गावाला गेलो.. शेवटी मी पण माणुस ना.. मला पण तिच्याबद्दल वाटायला लागलं.. परत आलो तेव्हा मित्र म्हणाला ती दुस-याबरोबर असते..आणि त्याच संध्याकाळी दिसली ना दोघं एकत्र.. मी सरळ गेलो आणि थोबाडीत मारली तिच्या.." काय्य? मी त्याला परत विचारलं.. "काय केलंस तू?" म्हणजे हे भन्नाटच होतं..
"मारलं.. आणि हेसुद्धा म्हणालो.. तुझा अपमान झाला असेल तर ह्यापेक्षा जास्त गर्दी असताना दोन्ही गालांवर मार माझ्या.. बदलाच घ्यायचा असेल तर.. पण तुला परत काही करता येत नाही.. प्रेम पण परत नाही करता आलं.. पण आत्ता मी तुझं प्रेम तुला व्याजासाकट परत केलं... आणि निघुन आलो तिथुन मी" मला एकदम आदर वाटायला लागला त्याचाबद्दल.. कसला माणुस आहे.. काहीही करतो..आणि कोण कुठली मी .मला अगदी लहान मुलं गोष्ट सांगतात तसं सगळं सांगत होता.

"तुझा नंबर देउन ठेव.. संपर्कात राहुया आपण" तेवढ्यात पेपरची बेल वाजली, आम्ही आत गेलो.. त्याने सगळे दात दाखवुन परत एकदा best of luck दिलं. मी पण हसुन बघितलं. पेपर झाल्यावर खुप जोरात पाऊस पडत होता. बाबा घ्यायला आले होते मला.. त्याला म्हणाले चल स्टॅण्डपर्यन्त सोडते तुला.. बाबांनी विचारलं मला "कसा होता पेपर?" मी म्हणाले "चांगला होता".. तेवढ्यात आनंद लगेच म्हणाला "पुढच्या वेळी नक्की पास होईन हा विश्वास आहे मला"... मग मी बाबांशी बोलत राहिले. त्याची उतरायची जागा आली.. तो उतरला..पाउस होता त्यामुळे पळत पळत आडोश्याला जाउन उभा राहिला... आणि तिथुन हात हलवला.. मला एकदम लक्षात आलं की त्याला आपण फोन नंबर दिलाच नाही.. पण तेव्हा उशिर झाला होता. मी पण फक्त हात हलवला.. त्याने त्याचं मोठ्ठं smile दिलं..

पुन्हा कधी तो भेटेल माहित नाही.. जेव्हा कधी भेटेल तेव्हा मी आपणहुन जेवढं मोठं smile देउ शकते तेवढं देईन.. :)



Thursday, July 30, 2009

म्याव २

करड्या आणि ताई जोरजोरात ओरडत होते. आई कुठे गेली आहे, का गेल्ये हे त्यांना अजुन कळलं नव्हतं. मी त्यांना सांगणार होते, आई आपल्याला सोडुन गेल्ये म्हणुन पण त्यांचा माझ्यावर विश्वास बसला नसता. मी त्यांच्याकडे बघत शांतपणे बसुन होते. पिंगळी मावशीची वाट बघत होते मी. आई तिला नक्कीच सांगुन गेली असेल. मावशीला माहित असेल बहुतेक सगळं!

.... कितीत्तरी वेळ झाला होता. आता मी जिथे बसले होते...तिथे माझ्या अंगावर उन यायला लागलं होतं. ओरडुन ओरडुन करड्या आणि ताई दमले. करड्या तर माझ्या जवळ येउन ऊन खात झोपला. ताई जागीच होती पण ती नुस्ती बसुन होती, काहीही न बोलता. एकदम शांत! मला एकदम ती आईसारखी वाटली..मला आता रडु येणार होतं म्हणुन मी ताईच्या जवळ जाऊन बसले. तिला चिकटुन बसले अगदी. मी जवळ आलेलं तिला मुळ्ळीच आवडायचं नाही पण आत्ता ती काहीच बोलली नाही. माझ्याकडे एकदाच पाहिलं...मग डोळे मिटले आणि दुसरीकडे मान फिरवली. थोडी आक्रसुन बसली आणि एकदा जोरात शेपटी हलवली. मला ती लागली. बहुतेक तिला सुचवायचं असेल की जरा लांब बस. पण मी तिला चिकटुनच बसले. अजिबात हलले नाही. आईची आठवण येत होती आता मला खूप... खूप म्हणजे खूप जास्त...मी ताईच्या अजुनच जवळ सरकले, तिच्या पोटात माझं डोकं घासत जवळ गेले. आईसारखी ती पण उबदार होती..पण आई नव्हती... आई काल रात्री नक्की काय सांगत होती आपल्याला? आई परत येणारे ना? ती परत येईपर्यन्त आता मी ताई आणि करड्याचं ऐकायचं असं ठरवलं होतं.

आम्ही बसुन होतो. मधेच २-३ कावळे उडत जायचे. कावळा गेला की ताई फक्त एकदा माझ्याकडे आणि करड्याकडे बघायची. मग परत डोळे बारीक करुन बसायची. कावळ्यांना आम्ही दिसत नसणार. आईने आम्हाला अश्याच जागी ठेवलं होतं..जिथुन आम्हाला सगळं दिसायचं पण आम्ही कोणाला सहज दिसत नसु. आम्ही एका माणसाच्या घरात राहत होतो. त्याच्या खिडकीपाशी आईने ठेवलं होतं आम्हाला. पण मी आजवर माणुस हा प्राणी पाहिला नव्हता. कारण आम्ही राहत होतो त्या घरात कोणीच माणुस राहायचा नाही. पिंगळी मावशी मात्र एका घरात राहायची जिथे माणसं पण असायची. करड्या म्हणाला होता "माणसांनी पाळलं आहे तिला". म्हणजे काय ते मला कळलं नव्हतं. करड्याने समजावलं होतं मग..."अगं म्हणजे ना...माणसं आपल्याला खायला-प्यायला आणुन देतात. आपल्याला खेळण्यासाठी कोणीतरी मिळतं. आपला वेळ चांगला जातो. आपण आराम करायचा..काही हवं असेल तर माणुस करतो. हवं तेव्हा फिरुन या, हवं तेव्हा उन्हात मस्त एखादी झोप काढा...ते नको असेल तर माणसांच्या जवळ जाऊन झोपा... कसली काळजी नाही..काही काम नाही." मी विचार करत होते...आपल्याला पण माणसांनी पाळायला हवं ना... तेवढ्यात करड्या म्हणाला होता " मला नकोय पण कोणी माणुस-बाणुस..मी स्वतः खाणं शोधेन, शिकार करेन, माझ्या जागेत राहेन... असं सगळं काम करायला माणुस काय ठेवायचा?.. आपलं आपलं मस्त जगायचं" मी आपलं बघत बसले त्याच्याकडे... तो किती हुशार होता. ताई किती मोठ्या मांजरी सारखी वागायची... मीच अशीच... ते म्हणतील तसं वागणारी...तसा विचार करणारी!

आता भुक लागत होती. सूर्यपण दिसत होता खिडकीतुन. आई नाही तर आपण खाणार काय? अरे बापरे...हा विचार मी केलाच नव्ह्ता की... ताई आणि करड्याला पण भुक लागली असावी आता. ताई एकदा इथे-तिथे फिरुन आली. करड्या बाजुच्या एका दोरीशी खेळत होता. "साप-जनावरं वगैरे पकडायची सवय करतोय" असं म्हणणं असायचं त्याचं. त्या दोघांनी ह्याआधी किडे खाल्ले होते. मीच अजुन आईचं दुध सोडुन काही खाऊन पाहिलं नव्हतं. मला काही खाताच आलं नाही तर? काय होईल माझं? मला दुध कसं मिळणार? मला एकदम भीती वाटायला लागली. आई कुठे गेली असणारे? मला अचानक वाटायला लागलं, एखाद्या माणसाने येऊनच आपल्याला न्यायला हवं.

तेवढ्यात पिंगळी मावशी आली. आम्ही तिघंही टुणकन उड्या मारुन बसलो. ती खास काही बोल्ली नाही. माझ्याकडे पाहिलं फक्त तिनं..एकदम विचीत्र नजरेनं. ताईजवळ जाऊन तिने ताईला चाटलं. मग करड्याकडे बघत म्हणाली. "भुक लागली का?", मला खरं तिच्याजवळ जायचं होतं. तिला सांगायचं होतं.."मावशी तुला माहित्ये ना... ते मलाही माहित्ये बहुतेक"..पण ती तिथुन गेली. "मी येते काहीतरी खायला घेउन..मग पुढे काय करायचं ते बघु आपण... मी आल्यावर आपण इथुन निघणारोत" असं सांगुन गेली.

करड्या एक्दम गुरकावला... "म्हणजे काय? आई कुठे आहे? काय झालं आहे? आपण का जायचं इथुन?" त्याचे डोळे मोठ्ठे झाले. अंगावरचे सगळे केस उभे राहिले. शेपुट फुगली त्याची..त्याने नखं बाहेर काढली... "ही मावशी वाईट्ट आहे" . ताई एकदम ओरडली त्याच्यावर.. "करड्या... शांत बस. आई आपल्याला सोडुन गेली आहे. ती आता अशक्त झाली होती. आपल्याला सांभाळू शकत नव्हती. स्वतःला सांभाळायची शक्ती नाहीये तिच्यात...कदाचित परत येईल, कदाचित... आजपासुन मावशी आणि मी आहोत आई येईपर्यन्त!" मी बघतच बसले. ताईला कसं कळलं हे? ताईने माझ्याकडे बघितलं. पहिल्यांदा आपणहुन माझ्या जवळ आली. मला चाटलं... "छोट्या, जागी होते मी काल रात्री. मला माहित्ये सगळं..काळजी नको करु बाळा... मी आहे" मी माझी मान तिच्या अंगावर घासली आणि मला तिच्या डोळ्यात पाणी दिसलं.

...

Monday, June 29, 2009

म्याव...१

त्या दिवसापर्यन्त मला काहीच दिसत नव्हतं... फक्त माझ्या आईचा, एका भावाचा आणि एका बहिणीचा आवाज ऐकु येत होता... त्या दोघांचे डोळे कदाचित माझ्या आधीच उघडले होते. "आई, हे काय आहे?", "आई मी हे खाऊ का?", "आई ही अजुन डोळे का उघडत नाहिये? " असे प्रश्न विचारुन ते आईला त्रास देत होते. पण आई शांतच असायची. मला आईचा आवाज ऐकायचा असायचा पण ती खुप कमी बोलायची. जेवढा वेळ आमच्याबरोबर असायची त्यातला बराचसा वेळ ती मला चाटण्यात घालवायची.

"आई तू आमच्यापेक्षा त्या पिल्लावरच जास्त प्रेम करतेस. त्याचे डोळेपण उघडले नाही आहेत. ते नीट दुध पीत नाही. ते काही बोलत नाही..ते आमच्यासारखं फिरतपण नाही पण तू त्यालाच चाटत बसतेस" माझा भाऊ म्हणाला. त्याचा आवाज खुपच खरखरीत होता. त्याची नखं पण लागायची. मी आईला सांगितलं नव्हतं पण ती बाहेर गेली होती तेव्हा त्याने माझ्या मानेवर जोरात मारलं होतं. खूप दुखत होतं. ती दोघं मिळुन मला वेगळं का पाडत होती माहित नाही. माझे डोळे अजुन उघडले नाही म्हणुन? त्यादिवशी आईनी मान चाटायला घेतली तेव्हा ती थांबली, तिने मला जवळ घेतलं आणि अचानक उठून निघुन गेली. आई मानेवरुन हात फिरवते, चाटते तेव्हा खुपच आवडतं मला. एकदम छान वाटतं. नंतर मला त्या दोघांनी सांगितलं की आई माझ्यामुळे रडत होती. माझे डोळे अजुन उघडले नाही त्याला मी काय करु शकत होते?

मी मनापासुन माझे डोळे उघडायचा प्रयत्न करत होते. खुप जोर लावत होते. माझे पंजे जमिनीत घट्ट रोवले होते मी... मला डोळे उघडायचे होते..मला आईला बघायचं होतं, माझ्या भावंडांना बघायचं होतं. इतके आवाज येत असतात त्या सगळ्यांना बघायचं होतं. दोन दिवसांपुर्वी म्हणे एक काळा राक्षस आला होता. त्याचा आवाज खरचं खूप भयानक होता. आई म्हणाली "ह्याचापासुन सांभाळुन राहा काही दिवस.. तुम्ही मोठे झाल्यावर प्रश्न नाही..मग तो तुम्हाला घाबरेल"... मला खुप भीती वाटत होती. मी आईला विचारलं "आई काळा म्हणजे काय गं?" आई तिथुन निघुन गेली. आई असं का करते कळतच नाही. भाऊ म्हणाला " तुला आत्ता जे काही दिसतयं ना ते म्हणजे काळं..." मला काहीच दिसत नाही.. म्हणजे काळा... तो राक्षस खुपच भयानक असणार म्हणजे. त्याला कावळा म्हणतात असं नंतर पिंगळी मावशी सांगत होती.

पिंगळी मावशी म्हणजे आईची बहीण. ती अधुन मधुन आमच्या इथे येते उन खायला. परवा ती आईला सांगताना मी ऐकलं "मोने, का लळा लावत्येस ह्या अशक्त पिल्लाचा? काय होणारे त्याने? किती दिवस पुरणारेस तू त्याला? बोक्याला दे गं... त्याची नजर आहेच इथे. निदान तुझ्या बाकी दोन पिल्लांचा जीव तरी वाचेल. तू ह्या पिल्लापायी तुझं काय करुन घेतलं आहेस ते बघ" आई नेहेमीप्रमाणे काहीच बोलली नाही. पिंगळी मावशी काय म्हणाली मला कळत नव्हतं पण ती जे काही म्हणाली त्याने जरा भीती वाटली. बोका कोण? अशक्त म्हणजे काय़? ती माझ्याबदल बोलत होती का? आता मला डोळे उघडायलाच हवे होते

त्या दिवशी मी खुप वेळ झोपले होते. आईने मला चाटुन चाटुन उठवलं...मी उठले आणि डोळे उघडले... क्काय्य? मी डोळे उघडले? मी परत डोळे बंद केले आणि परत उघडले... कित्ती मज्जा होती... मी आता बघु शकते. पण काही दिसत का नाही आहे? मी डोळे उघडले ना? मला भीती वाटायला लागली... अजुनही सगळं काळंच का? मला कावळ्याने तर धरलं नाही आहे? मी पंजे मारायला लागले आणि अचानक डोळ्यांवर काहीतरी जोरात आलं... काळं नव्हतं ते... मला काहीतरी दिसतयं. आई... ती आईच होती... सुंदर, तिचे डोळे कसले मोठे होते. बहिणीने सांगितलं होतं मला... आई पांढरी आहे, आणि आपण सगळे करड्या रंगाचे आहोत. पांढरी... काळ्याच्या एकदम विरुद्ध... "आई मी बघु शकत्ये... मला तू दिसत्येस आई.. पां-ढ-री". मग माझा भाऊ पुढे आला... "छोट्या दिसायला लागलं तुला? छान झालं" त्याचा चेहे-यावर काळे पट्टे होते. बहीण खेळत होती, ती सुंदर होती. मी खुपच लहान होते त्या दोघांच्या मनाने..म्हणुन मला ते छोट्या म्हणायला लागले होते.

मग मी पिंगळी मावशी पाहिली. बोका पाहिला.. आमची आई त्यासगळ्यांच्या मनाने खुपच छोटी होती.. मी पण छोटी होते... अशक्त...पिंगळी मावशी म्हणाली होती... अशक्त! त्यादिवशी झोप येत होती तरी मी झोपले नाही कारण मला डोळे बंद करायचेच नव्हते. डोळे बंद केले आणि मग ते परत उघडलेच नाही तर? मी आजुबाजुला बघत होते. नवीन नवीन काही काही कळत होतं. मग अचानक बाहेरही काळं होयला लागलं. मी घाबरले... आई म्हणाली "रात्र झाली". मी दुध प्यायलं, आईला चिकटुन बसले होते. आईने मला चंद्र दाखवला. मला अजुन जवळ घेतलं आणि म्हणाली.

"छोट्या, तुझे डोळे उघडायची वाट बघत होते मी. आज तुझे डोळे उघडले, मी मोकळी झाले. बाब्बा सांभाळुन राहा हं. काही वाटलं ना तर रात्र झाल्यावर ह्या चंद्राला सांग... मी तिथेच असेन कुठेतरी.. बाळा तू खुप अशक्त आहेस रे, आणि मी तुझ्याहुन जास्त... मला तुला सांभाळणं खुप कठीण जाणारे रे. मला इथे राहाणंच कठीण जाणारे. मी कदाचित परत येणार नाही छोट्या... करड्या आणि ताई कदाचित तुला त्रास देतील, पण त्यांच्याबरोबरच राहा. मोठ्ठी हो हं बाळा... मला निघायला हवं" माझ्या कानांवर फक्त शब्द येत होते..मला काही कळत नव्हतं..दिवस्भर जागी राहिले होते त्यामुळे आता झोप येत होती. आई म्हणाली त्याचा अर्थ आईला उद्या विचारु म्हणुन मी झोपले.

सकाळी उठल्यावर आईच्या बोलण्याचा अर्थ कळला. खूप खूप उशिर झाला होता. आईला शोधण्यासाठी आता चंद्र येईपर्यन्त थांबावं लागेल.


Saturday, May 16, 2009

Feeling Blue

तो: काय झालं गं तुला?
ती: I donno re... m feeling blue today!
तो: ब्ल्यु? मला तर चांगली काळी-सावळी दिसत्येस!
ती:...
तो: बरं बरं कशामुळे feeling blue?
ती: माहित नाही
तो: सांगत होतो... उजाला इन्संट व्हाईट्नींग वापर... नीळ नको वापरु, पण ऐकायचं म्हणुन नाही!
ओके... जोक्स अपार्ट, मग आता काय करणारेस?
ती: माहित नाही...
तो: तुला काहीच माहित नसतं... बरं हे तरी महित्ये का, तो ब्लु कोणता आहे ते? नेव्ही ब्लु आहे या फिर स्काय ब्लु आहे?
ती: गप रे!
तो: बरं .. मी अजुन त्रास देत नाही... ऐक जा जरा पिवळ्या उन्हात जाउन उभी रहा...
ती: ??
तो: निळा अधिक पिवळा...हिरवा होतो ना... सदाहरित होशील उन्हात, पण evergreen हौन हसत हसत परत ये काय... Green with envy वाली हिरवी नको होऊ!
ती: डोक्यात जाऊ नको!
तो: नाही गं... डोकं कुठे? तुझ्या पायांशी जागा मिळाली तरी खुप आहे... शंकर, कृष्ण आणि विष्णु नंतर निळी झालेली तुच ना... हे देवी..
ती: बास काय आता....
तो: तुझं आडनाव "फुले" असायला हवं होतं गं.. मग आपण तुला निळी फुले म्हंटलं असतं
ती: माझी चिडचिड करतो आहेस...
तो: तेच तर हवंय... माझ्याकडचा जांभळा रंग संपलाय, रागाने लाल होशील, आणि मग तुझ्या feeling Blue मधे तो लाल मिसळुन जांभळा तयार होईल... है किनई?
ती: जा.. मी तुझ्याशी बोलत नाही आहे...
तो: असं नको करु गं... मला ना आज सोसायटीतल्या लहान पोरांबरोबर खेळायला जायचं आहे.. आम्ही ना "crocodile crocodile, what colour do you want?" खेळणारोत! तुमच्या मराठीत "पिंकी पिंकी कोणता रंग?" असं काहीतरी... तू पण चल... निळा रंग आल्यावर तुला रंग शोधत धावायची गरज पडणार नाही...
ती: बर्र्रर्र
तो: अगं पण काय झालं... असं वाटायला?
ती: अखेर विचारावसं वाटलं..
तो: हो गं.. तसं मला खुप दिवसांपासुन हेच सांगायचं होतं गं... एक तर ओर्कुटींग कमी कर... किंवा करायचं आहेच तर एवढ्या स्कीन आहेत तिथे... किती दिवस निळी स्कीन ठेवणारेस? rodies ठेव त्यापेक्षा...
ती: झालं परत सुरु?
तो: sorry... एक request आहे... आज प्लीज चंद्रकोर नको लावुस.
ती: क्काय्य?
तो: मला "निले निले अंबरमे चांद जब..." गावं लागेल..
ती: चल, मी निघत्ये...
तो: आज कोणत्या फिल्मवर काम करु नको.. नको ती फिल्म व्हायची!
ती: बडबड करु नको.. बाय
तो: अगं थांब... जाता जाता मला ते गाणं देउन जा ना..."निली आस्मानी छत्री"...
ती: कसं आणि कुठुन देउ? हेच गाणं हवं असणार तुला, पिडायचं आहे ना मला...
तो: नाही गं पोरी... "ई" कर जरा... तोंड उघड की बये... मी पण माझं ब्लु-टुथ ऑन करतो...
ती: माझं चुकलं... मला माफ कर! मला अजिबात काही वाटत नाही आहे... m not feeling blue.. ठीक आहे? झालं समाधान?
तो: बरं अजुन २ सेकंद ब्लु फील कर.. मी एक कविता केल्ये तुझ्यावर...
Roses are Red... sky is new,
friends like you, are very blue....
आता थांबव ते feeling...
चल आता नवीन रंग, आता बाबा मी फ़ील करणार...
"मेरावाला orange"
........

Saturday, May 2, 2009

दूर राहिले माझे खेडे...


चरवेली, मुंबई-गोवा महामार्गावर हातखंब्याच्या जरा पुढे गेल्यावर लाल धुळ बसलेला एक बोर्ड दिसतो. गणपती, होळी आणि मे महिन्यांत डोळे आसुसलेले असतात हा बोर्ड बघायला! हायवे सोडुन गावाकडे जाणा-या रस्त्याकडे वळलं की आजुबाजुची सगळी ओळखीची घरं आणि शेतं दिसायला लागतात. त्यातच आजोबांनी सुरु केलेली टुमदार काजु फॅक्टरी दिसते. तिथली माणसं दुरुनच हात वगैरे करतात. "बाळुकाकांची नात हो ती! मोहनची ना गो तु?" असं कोणीतरी केस पिकलेली, तोंडाचं बोळकं झालेली आजी तिचे बारीक डोळे अजुनच बारीक करुन विचारते...

नागमोडी वळणं घेत, काजु-आंब्यांच्या बागांमधुन उतरल्यावर समोरचं दिसते आमच्या गावची छोटीशी नदी. आणि गोड्या पाण्याचा एक १२ महिने वाहणारा झरा. नारळ-सुपारीची काही झाडं सुगरणीची घरटी मिरवत उभी असतात. खंड्या, कोतवाल,बगळा, टिटवी सारखे पक्षी पाण्याच्या आजुबाजुला दिसतात. मध्येच एखादा पोपटांचा थवा आकाशातुन उडत जातो. झ-यावर पाणी भरायला आलेल्या ३-४ बायका "ही कोण पाहुणी मंडळी आली" म्हणुन आमच्याकडे बघत असतात...त्यातच समोरुन आमच्याघरी काम करणारा विजुभाऊ गुरं नदीवर धुवायला घेउन येताना दिसतो. बाबा गुरांकडे कौतुकाने बघतात... "पाडी कित्ती मोठी झाली..." म्हणत एखाद्या गायीवरुन हात फिरवतात.

जरा पुढे गेल्यावर आमची वाडी दिसायला लागते... वाडी म्हणजे खरं तरं चारचं लेले कुटुंबांची घरं आहेत. आमचं घर सर्वात शेवटी आहे... घराच्या वाटेवर तीन चाफ्यांची झाडं लागतात... तीनही चाफे वेगळ्या रंगांचे. चाफ्याचा वास मनात साठवत असतानाच झाडांआडुन आमचं घर दिसायला लागतं. घराच्या गडग्याजवळची गुलबक्षी आणि जास्वंद आमच्या स्वागताला फुललेली असते. सारवलेलं अंगण आणि अंगणातली तुळस, अंगणात घातलेली वाळवणं..आमसुलं, आंबोश्या, काजुच्या बिया, उन्हं खायला बसलेली दोन मांजरं, आणि दारात दुध-पाणी घेउन उभी असलेली काकु! ह्याला म्हणतात घरी येणं... लिफ्ट्मधुन उतरुन दारावरची बेल वाजवल्यावर सेफ्टीडोर मधुन डोकावुन मग कोणीतरी दार उघडणार, त्यात कुठे ही कोकणातल्या स्वागताची मज्जा?

घरी आत आल्या आल्या पडवीतला झोपाळा खुणावत असतो. पण काकु आतुन कोकम सरबत प्यायला बोलावत असते. माजघरात बसुन सरबत पित मी कौलातुन येणा-या कवडश्यासोबत खेळत राहते... इतक्यात आजोबा आत येतात, "पानं घेतलीस का गो? मुलींना भुका लागल्या असतील!" असं म्हणत नैवेद्य दाखवायला स्वयंपाकघरात जातात. फणसाची भाजी, कुळिथाचं पिठलं, अळुची भाजी, आमरस ह्यातलं त्या सिझन मध्ये मिळत असेल ते पानात असतं. पोळी सोडल्यास सगळं काही घरच्या धान्य, फळं, भाज्यांनी बनवलेलं. आपल्याला हवी ती भाजी शेतातुन आणुन ती बनवुन खायची मज्जा बिग बझारच्या packed vegetables मध्ये कशी यायची?

दुपारच्या भरगच्च जेवणानंतर थोडावेळ आराम केल्यावर आजुबाजुच्या बागांत, शेतांत भटकायचा अनुभव वेगळाच असतो. सगळीकडे शांतता असते. मधुनच एखादा पक्षी ओरडत असतो... झाडंही दुपारची डुलकी घेत आहेत असं वाटावं इतका मंद वारा असतो. मगाशीच नदीवरुन स्वच्छ होऊन आलेली गुरं गोठ्यात रवंथ करत बसलेली असतात. मधुनच घरावरुन जाणारा एखादा माणुस "ओअ..काका" अशी आजोबांना हाक मारुन जातो. मग कोणीतरी "मुंबईकडची पाहुणी कधी आली?" म्हणत विचारपुस करतो. गावातली सगळी माणसं आपल्या आजोबांना ओळखतात ह्या गोष्टीचा मला लहानपणापासुनचं खुप अभिमान वाटत आलाय...आणि त्याचमुळे असेल कदाचित, पण आमच्या लहानश्या सोसायटीतलेही सगळे आम्हाला ओळखत नाहीत ह्याचं वाईटही वाटतं.

दिवेलागणी झाली की आम्ही झोपाळ्यावर बसतो. अथर्वशीर्ष, रामरक्षा आणि पाढे म्हणत... आजही मला वाटतं की रामरक्षा म्हणावी तर ती कोकणातल्या एखाद्या पडवीतल्या झोपाळ्यावर बसुनचं! आणि मग जमणारा गप्पांचा फड... रात्रीच्या मऊ खिचडी किंवा पिठलं भातानंतरचं ताक... आणि रातकिड्यांच्या किरकिरीत कधीतरी गप्पांमध्येच लागलेली झोप! डोक्यावर पंखा नसला तरी तिथे शांत झोप लागते.

सकाळी उठल्यावर खोपटातल्या चुलीजवळ बसायला मस्त वाटतं... चुलीवर मोठ्ठालं पितळ्याचं पातेलं पाणी उकळवत ठेवलेलं असतं. स्वयंपाकघरामागच्या चुलीवरही असंच एक पातेलं असतं, त्यात मऊभात रटरटत असतो. मऊ भात,मेतकुट, लिंबाचं लोणचं किंवा फोडणीची मिरची, चुलीत भाजलेला पोह्यांचा पापड, दह्याची कवडी....आह्ह, पंचपक्वान्नं गेली उडत अश्या मऊभातासमोर! आत्ता हे नुस्तं लिहीतानाही मला भुक लागल्ये. भातावर सोडलेल्या साजुक तुपाच्या धारेचा वास येतोय...

आंब्यांचा मोहोर दिसतोय, माडीवर लावलेली आंब्यांची आढी दिसत्ये...बागेतल्या एका रायवळ आंब्याची चव जिभेवर रेंगाळते आहे, सारवलेल्या अंगणाचा, गोठ्यामागच्या बकुळीचा, पाटातल्या पाण्याचा वास दरवळतो आहे. सकाळ-संध्याकाळचे वेगवेगळे पक्षी, पडवीतल्या झोपाळ्याचा "टकर्रर्र-कट्ट" आवाज, मधुनच गोठ्यातल्या वासराचं हंबरणं ऐकु येतं आहे. समोरची कंप्युटर स्क्रीन आता धुसर होत्ये... गदिमांचं "दुर राहिले माझे खेडे" गाणं सारखं वाजतं आहे. आता फक्त सुट्टीची वाट बघायची!

Sunday, March 22, 2009

लेले... तेजस्विनी लेले!!

कित्तीतरी दिवसांपासुन बोटांना अडवुन ठेवलं होतं हे नाव टायपण्यापासुन ह्या ब्लॉगवर... पण आज राहवलचं नाही!
इतकं छान, मस्त, दणदणीत नाव असताना..जास्वंदी काय? म्हणजे मला जास्वंदाची फुलं आवडतात पण स्वत:च्या नावापेक्षा जास्त नाही. आज आत्ता मी स्वत:ला जेम्स बॉंन्ड्सारखं "लेले...तेजस्विनी लेले..." असं नाव सांगताना imagine केलं आणि माझी मला solliidd आवडले.. ( नेहेमीसारखीच :) ).

बरं पण मग "जास्वंदी हे नाव का घेतलं होतस?, anonymous का होतीस?, आता का नाहीस?, ह्या पोस्ट्नंतरही ब्लॉगवर जास्वंदीच नाव आहे..असं का?,..." वगैरे वगैरे अनेक प्रश्न सहाजिकच डोक्यात येतिल तुमच्या... (असे कसे नाही आले? यायलाच हवेत!) पण सध्या ह्यातल्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर द्यायल्या माझा mood नाही आहे..खोटं का बोलु? मला ह्या प्रश्नांची उत्तरं ठाऊकच नाही आहेत! त्यामुळे हा भाग विसरुन जाऊयात... तर माझं नाव तेजस्विनी लेले आहे. म्हणुन बघा एकदा मोठ्याने..सही वाटतं (नाही सही वाटलं तर स्वत:चं नाव मोठयाने म्हणुन पहा..ते सही वाटेल).

तर एक कोणीतरी माणुस आणि त्याचं कुटुंब व्यापारासाठी जहाजातुन जात असताना जहाज बुडालं... ते कुटुंब वाचलं आणि विजयदुर्ग, मुटाटला (सिंधुदुर्गात) स्थायिक झालं. मग पिढ्या वाढत गेल्या..काही मंडळी खानूत आली..तिथुन चरवेली... त्यांच्यातला एक पोरगा अलिबागला आला... आणि मी त्याची मुलगी! तर त्या जहाजवाल्या व्यापारी माणसाला "लेले" आडनाव आवडलं असावं म्हणुन आज मी लेले आहे! आमच्या आडनावातुनच आमचा दानशुरपणा ओतप्रोत वाहातोय... कित्ती क्युट आडनाव आहे "लेले"..छोटुकलं छान!
आता तुमच्यातल्या ब-या़च जणांना स्टॅम्पचा जोक आठवला असेल... स्वतःला मोठे शिक्के पाडायला लागतात म्हणुन जळणारे लोक असले जोक बनवतात..तो "ले" च्या स्टॅम्पचा जोक नक्कीच कोणा "सहस्त्रबुद्धे" किंवा "इचलकरंजीकर" सारख्या आडनाववाल्यांनी बनवला असेल.

लेले आणि नेने वगैरे जोक पण खपतात कारण उच्चारायला सोप्पी आडनावं आणि सारखीच आहेत म्हणुन... दोन्ही आडनावांमध्ये साम्य आहे मान्य! पण म्हणुन मला तेजस्विनी नेने म्हणणा-यांचा मला दणकट राग येतो. माधुरी दि्क्षीतचं लग्न ठरलं तेव्हा कित्येकांनी "तुमची झाली आता माधुरी... तुमच्या नात्यात आहेत का श्रीराम लेले?... " असे प्रश्न विचारले होते. ’न’ आणि ’ल’ ह्या अक्षरांमधला साधा फरक का कळत नाही लोकांना?

तर मला माझं आडनाव खूप खूप आवडतं. सगोत्री लग्न चालत नाही म्हणुन नाहीतर मी "लेले" आडनाववाल्यांशीच लग्न केलं असतं. आत्ताही लग्न झाल्यावर आडनाव न बदल्याण्याचा विचार आहे माझा... पण जेव्हा मी माझ्या आईबद्दल विचार करते तेव्हा न बदल्याण्याचा विचार मनातुन काढते... म्हणजे बघा ना... आम्ही सगळे "लेले" आणि घरात आई एकटी रानडे असती तर किती विचीत्र वाटलं असतं आम्हाला... म्हणुन आडनाव बदलणं ठीक वाटतं मला ( ह्याबाबतीत अजुन arguments नको... माझं confusion वाढतं). काही झालं तरी मी माझं नाव मात्र बदलणार नाहीये हे नक्की!

’इन्स्पेक्टर तेजस्विनी’ वरुन तुझं नाव ठेवलं आहे का? असं मधे मला कोणीतरी विचारलं होतं.अश्शी चिडचिड झाली होती माझी... लोकं काहीही विचारु शकतात! एका काकुंनी हे नाव सुचवलं आई-बाबांना म्हणुन हे नाव ठेवलं त्यांनी...इतकं साधं आहे ते, पण त्याचवेळेस हे नाव आमच्या कुलस्वामिनीचं आहे म्हणुन मला दिलं घरच्यांनी! ( Thank god.. अंबाबाई नाही ठेवलं..अंबाबाई लेले..मज्जा नसती आली). जन्मदाखला, छोटा शिशू पासुन आत्ता सिनिअर मास्टर्सच्या सगळ्या वह्या-पुस्तकांवर, रेशनकार्डावर, सर्टिफिकेट्स, बक्षिसांवर, ओळखपत्रांवर, पारपत्रावर.... कित्ती ठिकाणी हे नाव लिहीलं, छापलं गेलं... तसं मला "तेजस्विनी" नावाने जास्त कोणी बोलावलं नाही... सगळे तेजुचं म्हणायचे/म्हणतात. माणुस जवळचा आहे लांबचा, मला आवडणारा की न आवडणारा ह्यावर त्याने मला काय हाक मारायची हे ठरतं.

"तेजस्विनी लेले" मी एकटी नाहीये ह्या जगात, एक भरतनाट्यम च्या मोठ्या नर्तिका आहेत तेजस्विनी लेले नावाच्या! मला त्याचा अभिमान आहे... माझं नाही पण माझ्या नावाच्या एकीचं नाव आहे ह्याचा!! [:)]. अजुन काही तेजस्विनी facts:
1) केरळात तेजस्विनी नावाची एक खुप सुंदर नदी आहे.
२) तेजस्विनी नावाची एक सिरिअल लागायची ज्यात रेणुका शहाणे होती.
३) अनेक स्त्री-पुरस्कारांची नावं तेजस्विनी असतात. ( मिस. SNDT ला "तेजस्विनी" म्हणतात. पोरी तेजस्विनी बनायला दिवस-रात्र मेहेनत करतात :) )


तर to conclude... तेजस्विनी लेले माझं नाव आहे (जे तुमच्यापैकी अनेकांना कधीपासुनच माहित्ये). जसं तुम्हाला तुमचं नाव आवडतं तसं मला माझं नाव भरपुर आवडतं. बास्स!!

- तेजस्विनी लेले

( मला ठाऊक आहे..ह्या पोस्टला काहीही साहित्यिक value वगैरे नाहीये (माझ्या कुठल्याच पोस्टांना तशी ती नसते) ... ह्यापेक्षा जास्त value "चहाची पाककृती" ला असेल. पण तरी मला माझ्या नावाविषयी असणारं प्रेम मला इथे लिहायचं होतं... आणि दुसरं म्हणजे "तेजस्विनी लेले" नाव अनेकांना माहिती होईल, प्रसिद्ध होईल इतकं माझं कर्तुत्व असेल ह्याची मला खात्री नाही त्यामुळे इथे नाव अनेकदा छापुन आल्याचा आनंद मिळवला)

Saturday, February 14, 2009

Valentimes Day :)

मी त्या सगळ्या मुलांच्या घोळक्यामध्ये बसलेले होते आणि त्या पिल्लांना विचारलं, "14 फेबला काय असतं?" सगळे चिवचिवले( rather कावकावले) , व्हॅलनटाईम्स डे... मी अवाक होऊन बघत बसले, म्हणजे मुलांना हा दिवस माहित्ये म्हणुन नाही..कारण हल्ली शाळेत न जाणा-या मुलांनाही हा ठाऊक असेल... मी अवाक झाले ह्याला कारण म्हणजे १०-१२ वर्षांनंतरही मुलं valentine हा शब्द मी जसा चुकवायचे तसच चुकवतात.. :)

मला खरं तरं ३-४थीतल्या पोरांबरोबर व्हॅलनटाईन डेची activity घ्यायची नव्हती..पण आम्ही बापडे विद्यार्थी, शिक्षकांचं ऐकावं लागतं ना! खास काही करायचं नव्हतं त्यांना एखादी प्रेमाची गोष्ट वाचुन दाखवायची होती आणि मग त्यांच्या "Love" ह्या conceptबद्दल त्यांना विचारायचं होतं... मी चौथीत होते तेव्हा आमच्या वर्गात कोणी "Love" असं म्हंट्लं तरी आम्ही "ईईई...असं काय बोलतोस?" "ए, असं काही बोलायचं नसतं" वगैरे म्हणायचो, मराठी मिडीयम असल्याने Love हे फक्त सिनेमात हिरो-हिरोईन मधे असतं त्यालाच म्हणतात हा आमचा समज होता. पण आत्ताची ही "फोर्थ ग्रेड" मधली मुलं smart आहेत!

मला एक सुंदर पुस्तक मिळालं होतं My friend, the Sea म्हणुन. एका तामिळ मुलाचं समुद्राविषयीचं प्रेम, समुद्राशी त्याची मैत्री... त्सुनामी आधी आणि नंतरचं... इतक्या साध्या, सोप्प्या शब्दातलं Narration पण तरीही वाचुन डोळ्यांत पाणी आलं..जितक्यांदा वेगवेगळ्या वर्गांत वाचुन दाखवलं तितक्या वेळेला माझा गळा जड झाला होता. गोष्ट वाचुन दाखवल्यावर मुलंही भारावलेली होती...त्याच moodमधे त्यांच्याशी प्रेम आणि मैत्रीबद्दल बोलणं बरं होतं... कारण इतर वेळी बोलले असते तर "whom do you love?" विचारल्यावर मुलांनी त्यांच्या GF किंवा crushची नावं सांगितली असती. हो... ३-४थीतल्या पोरांना हे सगळं माहित्ये...त्यांचे crush असतात. आमच्या ह्या कोर्समध्ये मी एकटी मिडीयाची विद्यार्थीनी असल्याने असं काही मुलं म्हणाली की लगेच मी वर्गात मधोमध बसल्ये, आजुबाजुला आमच्या बाई आणि बाकी सगळ्या त्यांच्या students माझ्याकडे बोट दाखवताय्त "तुम्हीच केलंत हे... mediaचा परिणाम" वगैरे म्हणताहेत असं दृश्य फ़िशाय लेन्सनी बघितल्यावर जसं दिसेल तसं डोळ्यासमोर उभं राहातं.

मुलांना मी गोष्ट वाचुन दाखवली आणि मग माझ्या झोळीतुन गुलाबी रंगाचं एक heart shape card बाहेर काढलं... ही तिसरीतली मुलं आणि गुलाबी रंगाचं कार्ड बघुन... "yukk..its pink, its so girly" वगैरे म्हणतात. stereotype इतके दणदणीत भरल्येत ना हया पोरांच्या मनात. मी मुलगी असुन मला कधीच गुलाबी मनापासुन नाही आवडला आणि कायम मला निळा रंगाचं आकर्षण होतं, शाळेत असताना कधी माहितच नव्हतं असं काही असतं ते!

मग म्हंटलं जाऊ दे, गुलाबी नको तर नको.. निदान तुम्हाला Love म्हणजे काय असतं असं वाटतं हे तर सांगा.. आणि मग पोरं जे काय सुटल्येत म्हणुन सांगु... त्यांच्यापैकी काहींची उत्तरं अशी होती:

"Love is sharing." पोरगी smart होती. तिला पेन्सिल हवी होती माझ्याकडुन म्हणुन आधी हे उत्तर दिलं आणि मग लगेच माझ्याकडे पेन्सिल मागितली.

"Love is an abstract noun. You cant actually touch it!" चौथीतली पोरं आत्ताच abstract noun शिकल्येत ग्रामरमध्ये त्यामुळे हे उत्तर मला ४-५ जणांनी दिलं.

"Love is love, no words can define it." हे माझंही उत्तर आहे. rather अनेक प्रश्नांना माझं हेच उत्तर असतं जेव्हा मला त्याबाबतीत विचार करायचा नसतो. हे उत्तर दिलेला एक गुट्टु पो-या माझ्याकडे कायम असाच बघत असतो "काय पकवुन राहिल्ये ही..हिला काय करायचं love..हिला कोणी bf नाही का? आमच्यासोबत V day साजरा करत्ये".

"Love is happyness." मला happyness चं हे spelling खुप cute वाटतं. आणि त्या मुलाच्या शिकाऊ कर्सिव अक्षरात हा शब्द अजुन सुंदर दिसला. pursuit of happyness आठवला.

"Love is the feeling I get when my mom hugs me." विशाल हायपर ऍक्टिव्ह मुलगा आहे त्याच्याकडुन मी ह्या उत्तराची अपेक्षा नव्हती केली. पण मी प्रश्न विचारताच तो ताडकन उठत ओरडुन ओरडुन हे म्हणाला. आणि मग त्याला ते उत्तर मी लिहायला लावायच्या आधी दुस-या ग्रुपमध्ये पळुनही गेला.

"Love is playing and laughing with each other. "दोन अगदी जिवाभावाच्या सख्यांनी हे सेम उत्तर लिहीलं होतं, मी विचारलं सारखं उत्तर का? तर एक्मेकींकडे बघुन हसल्या आणि मग म्हणाल्या आम्हाला दोघींना असंच वाटतं.

Love rulez! ( no comments.. bcoz it does :D )

Love is friendship हे उत्तर ऐकुन मला कु.कु.हो.है चा शाहरुख आठवला. हे उत्तर देणारा रोहित सुद्धा तसलाच cute आहे, मस्त खळ्या पडतात त्याला

"Love is spending time with you family." हे उत्तर दिलेलं मुलगी तिच्या आईबाबांबरोबर राहात नाही. मला लहान मुलं अशी emotional झाली की खुप जड जातं. माझे डोळे भरुन आले होते खरं तरं तिचं उत्तर बघुन तेवढ्यात एका पिंटुकल्याने पुढचं उत्तर दिलं...

"Love is the thing people do when they come closer". आणि हे उत्तर सांगताना त्याचे डोळे चमकले. मी त्याला म्हणाले मला नाही कळलं.. तर लगेच म्हणाला like they do in the films... मग माझे डोळे चमकले :) ... माझ्यासारखं आहे कोणितरी ज्याला तिसरीत असताना love चा इतकाच अर्थ माहित्ये.

"Love means giving gifts to your family and friends." हे उत्तर वाचल्यावर मला हुश्श झालं... V day चं इतकं marketing केलं, मुलांमध्ये consumerism भरणा-या advertisersचे थोडेतरी तरी कष्ट कामी आले म्हणायचे!

मी एखादा प्रश्न विचारल्यावर माझ्या आजुबाजुला बसलेल्या सगळ्यांचा गलका, मग मी त्यांचं उत्तर ऐकावं म्हणुन त्यांनी केलेली धडपड, "whom do you love?" विचारल्यावर तिसरीतल्या एका गुंड्याने " I love my mom, dad, my fish, my doggie and you" असं दिलेलं उत्तर... मी गोष्ट सांगितल्यावर काही मुलांचे भरुन आलेले डोळे... एक्मेकांची चिडवाचिडवी... आणि तास संपल्यावर सगळ्यांचा मला "happy valentimes day" wish करायला झालेला गलका! मी त्यांचा शब्द नाही बदलला... मला बदलावासा वाटलाचं नाही. हा गेल्या २२ वर्षांमधला सर्वात मस्त V Day होता माझा!!

Thursday, January 8, 2009

येकष्ट्रा...

आत्ता मी बिल्लु बार्बर मधलं शाहरुखचं गाणं बघत होते. शाहरुखच्या मागे नाचणा-या एका लांब केस आणि दाढीवाल्या माणसाकडे लक्ष गेलं आणि तो एकदम ओळखीचा वाटला... नीट पाहिल्यावर लक्षात आलं, अरे हा तर ब-याच गाण्यांमध्ये असतो. हा माणुस award functions मधे वगैरे हिरो-हिरोईनच्या सर्वात जवळ नाचणारा माणुस असतो.
मला त्याला ओळखता आलं ह्याच्या आनंद झाला पण त्याहुनही जास्त आनंद ’अरे त्याला कोणीतरी ओळखल’ ह्याचा झाला. शाळेच्या गॅदरिंगमध्ये शेवटुन दुस-या रांगेत नाचणा-या मुलीचा अर्धा चेहरा दिसल्यावर तिच्या आई-बाबांना होत असेल इतका आनंद झाला.

काल मी सारेगामापा (हिंदी सारेगामापा असतं आणि मराठी सारेगमप असतं) बघत होते. त्यात प्रेक्षक म्हणुन टॅक्सीवाले, स्टेशनवरचे हमाल आणि कोळणी आल्या होत्या. मस्त enjoy करत होती ती माणसं... गाणी, नाच आणि त्याहुन जास्त Camera! मला माहित नाही की ही माणसं खरचं हमाल आणि कोळणी असतील की भाड्याने आणली असतील, पण त्यांच्यांकडे बघुन मला मज्जा वाटत होती. त्यांचे कपडे इतके स्वच्छ धुतलेले, इस्त्री केलेले होते. साफ दाढी केलेली, गंध वगैरे लावुन आलेली काही माणसं... कित्ती छान ना... जेव्हा त्यांना कळलं असेल असं shootingला जायचं आहे, त्यांनी किती तयारी केली असेल, त्यांच्या घरच्यांना कसलं कौतुक वाटलं असेल. घरातल्या बाबु-बाबींनी त्यांच्या सगळ्या मित्र-मैत्रिणिंना सांगितलं असेल कि " आमचे बाबा TVवर दिसणारेत". शुट नंतर घरी आल्यावर त्यांच्यांवर प्रश्नांचा भडिमार झाला असेल. काय होतं? कसं होतं? कोण कोण होतं? TV वर कधी दाखवणार?
ज्यादिवशी TVवर तो episode आला असेल तेव्हा घरचे सगळे TV समोर जमा झाले असतील.. स्वतःला, मित्राला, नव-याला, भावाला, बाबांना... तिथल्या प्रेक्षकांच्या गर्दीत शोधायचा प्रयत्न झाला असेल. आपला माणुस दिसल्यावर जल्लोष झाला असेल. कित्ती सही ना! पण जे दिसले नसतील त्यांना कसं वाटलं असेल ना? त्यांना कॅमेरावाल्याचा राग असेल, किंवा आयत्यावेळी आपल्या चेहे-यासमोर हात घालणा-या बरोबरच्या माणसाचा! बायको किंवा मुलगी रागाने म्हणाली पण असेल त्यांना "तुम्हाला जरा पुढे यायला काय झालं होतं? ते भावजी/काका बघा कित्ती नाचताय्त!"

मी हा सगळा अनुभव घेतलाय म्हणुन मी हे "कसं झालं असेल ना" वगैरे म्हणते आहे. ok, this is first time मी काहीतरी भन्नाट reveal करत्ये माझ्याबाबतीत... म्हणजे secret वगैरे नाहीये, पण हे आजवर कोणाला सांगितलं नाही. माझ्या अगदी जवळच्या मित्र-मैत्रिणींना पण नाही! लाज वाटली म्हणुन म्हणा किंवा "ई..काहीही होतं ते" म्हणुन त्याहुन जास्त तो माझा पोपट झाला होता म्हणुन!

तुम्ही सई परांजपेंचा "साज" पाहिलाय? आठवत नसेल तर संगीत क्षेत्रातल्या २ बहिणींची गोष्ट आहे. लता-आशा वरुन inspire झालीये असं म्हणतात. ह्या फिल्ममध्ये अरुणा इराणी, शबाना आझमी आणि झाकीर हुसैनही होते. आठवलं? त्यातली गाणी जबरदस्त होती...तर जेव्हा त्या बहिणी लहान असतात तेव्हाचं shooting हे अलिबागजवळ झालं होतं...

मी तेव्हा लहान होते. दुसरी-तिसरीत वगैरे... आमच्या एक ओळखीच्या काकू आमच्याकडे आल्या आणि त्यांनी सांगितलं की सई परांजपे येणारेत अलिबागमधे त्यांच्या एका फिल्मच्या शुटिंगसाठी. त्यांना फिल्मसाठी काही लहान मुली हव्या आहेत, हिरोईनच्या मैत्रिणी म्हणुन. साधे कपडे हवे आहेत, शाळेत जाणा-या मुली आधीच्या काळातल्या, परकर-पोलका वगैरे असेल तर ते कपडे घालुन पाठवा, आमच्या इथल्या काही मुली select झाल्या. मग आमच्या आयांना काय आनंद झाला होता. आपली मुलगी फिल्ममधे काम करणार याचा आनंद! माझ्या आणि माझ्या मैत्रिणीच्या आईने तर आम्हाला खास ह्या फिल्मसाठी नवीन परकर-पोलका शिवुन घेतला. उगाचच, पण आत्ता हे लिहिताना डोळे भरुन आल्येत! कित्ती कौतुकाने जाउन अलिबागच्या बाजारातुन चंद्रकोरीची टिकली आणली होती आम्ही. आईने अनेकांना सांगितलं होतं की "माझी मुलगी जाणारे शुटिंगला". गणपतीच्या दिवसांत शुटिंग होतं बघुतेक, कारण आम्ही तेव्हा ह्या शुटिंगसाठी गावाला जाणं पुढे ढकललं होतं.
साधारण आम्हाला वाटत होतं, आम्ही एक ८-१० जणी आहोत म्हणुन. आपल्याला काहीतरी डायलॉग असतिल असंही वाटलं होतं. मग ’ सई परांजपेंना मी आवडेन आणि मला त्या जास्त role देतील’ ही स्वप्नंही मी पाहिली.

"दि डे" उजाडला, सकाळी सगळ्या आयांनी आम्हाला घाबरु नका, लाजु नका, सांगतिल ते करा, सांगतिल तसं म्हणा वगैरे सुचना दिल्या. आम्हाला न्यायला बस आली... हो ब - स... ज्या शाळेत शुटिंग होतं तिथे गेल्यावर पाहिलं, अनेक मुली आल्या होत्या... शाळाच होती हो आख्खी. आम्ही तिथे जाऊन बसलो आणि मग पुढचा संपुर्ण दिवस त्या काकु जे सांगतिल ते करत होतो...एकदा तिथे बसा, एकदा इथे बसा... आम्ही शाळेतल्या मुली होतो... शाळेत मुली जे करतात तेच करत होतो. एकदाच कॅमेरा समोरुन गेला, खुप जवळ होता... चला आपण आत्तातरी दिसलो असु असं वाटलं. मी आणि माझी मैत्रिण आम्ही एकदा सई परांजपेंच्या समोर जाऊन पण उभ्या राहिलो होतो, त्यांनी लगेच आम्हांला एका चालु scene मधे मागच्या रांगेत पळत जाउन बसायला सांगितलं.... आमची पाठ तरी दिसायला हवी... नवीन परकर-पोलका शिवुन घेतल्याचं सार्थक झालं..पण चंद्रकोर मात्र नाही दिसली. ज्या दोन बहिणी झाल्या होत्या, त्या दिसायला खरचं खुप सारख्या होत्या... त्यातली एक मुलगी माझ्या बाजुला बसली होती एका scene मधे, त्यामुळे तिथेही मी अर्धी दिसले असेन. मधल्या वेळात तिच्याशी काहीतरी बोलायचं म्हणुन मी विचारलं "तुम्ही खरचं बहिणी आहात?" तर मी कित्ती बावळट आहे अश्या नजरेने तिने बघितलं होतं माझ्याकडे! आता खरं सांगु तर त्या आठवणी खुप पुसट झाल्यात... एका सिनमधलं "वाह वाह, बहोत अच्छा गाया" वगैरे वाक्य अजुनही आठवतं आहे... कारण आम्ही वैतागलो होतो इतक्या वेळेला retake झाला होता त्याचा... बाकी इतकंच आठवतय की आम्ही आमचं shooting नसताना बर्फाचा गोळा खाल्ला होता. आणि संध्याकाळी बस मधुनच घरी आलो होतो.

घरी आल्यावर आई-बाबांनी अनेक प्रश्न विचारले होते. काय झालं? कसं झालं? कोण होतं?.... मी सगळं काही झालं तसं सांगितलं... दुस-या दिवशी आम्हाला कोकणात गावाला जायचं होतं, आता तिथे कळलं होतं की मी कुठल्याश्या shootingला गेल्ये त्यामुळे आम्ही २ दिवस उशिरा येतोय... त्यामुळे आईने लगेच मला दटावलं... तिथे गेल्यावर विचारतील काय झालं? कसं झालं? वगैरे... तर सांग तू त्या लहान मुलीची मैत्रिण होतीस म्हणुन, १-२ डायलॉग होते म्हणुन सांग... का ते मला तेव्हा कळलं नाही पण मी आईने सांगितल्यानुसार तिथे सांगितलं! ही माणसं जाउन "साज" कधिही बघणार नाहीत ह्याची खात्री होती आईला! मीसुद्धा आजवर साज पाहिला नाही आहे. मी त्यात किती दिसले मला माहित नाही... माझ्या मैत्रिणीने मी दिसल्याचं मला सांगितलं. आज हे सगळं आठवल्यावर खुप हसु येतं, विचीत्र काहीतरी वाटतं.

परवा माझ्या कॉलेज प्रोजेक्टच्या short filmचं shooting होतं. मला फक्त ८-१० मुलं हवी होती, ती आली... त्यांच्या आयांनी त्यांना पावडर लावुन, नवीन कपडे घालुन पाठवलं होतं. त्या सगळ्या मुलांमध्ये मला १३-१४ वर्षांपुर्वीची मी दिसत होते. सगळं आटपल्यावर मी त्या पोरांना एकत्र केलं आणि प्रत्येकाला कॅमे-यासमोर नाव आणि इयत्ता सांगायला लावली.... फ़िल्मच्या credits ची वेळ वाढणार होती ह्यामुळे..पण मला चालणार होतं... हे दरवेळी जमेल असं नाही, पण ह्यावेळी हे माझ्या हातात होतं.. उद्या त्यांना CD दिल्यावर मी दिसलेच नाही ह्याचं वाईट नाही वाटणार कोणाला...

उद्या चुकुन-माकुन मी झाले कोणी मोठी...तर माझ्या filmography मधे सर्वात आधी मी ’साज’ चं नाव नक्की लिहिन. :)